Monday, January 05, 2009

चिमुकल्यांचे स्थलांतर.
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते. आज जगात बरेच पक्षी, मोठे प्राणी, मासे स्थलांतर करतात पण अतिशय चिमुकली, नाजुकशी फुलपाखरेसुद्धा स्थलांतर करतात हे बऱ्याच जणांना कदाचित नवीन असेल. लहान आणि नाजुकसुद्धा असणारे हे किटक प्रचंड लां अंतराचेसुद्धा स्थलांतर सहजासहजी करतात. पण तरीसुद्धा पक्ष्यांचे स्थलांतर आणि फुलपाखरांचे स्थलांतर यात थोडा फरक आहेच. पक्ष्यांचे स्थलांतर दुमार्गी असते तर फुलपाखरांचे एकमार्गी असते. पक्ष्यांसारखी फुलपाखरे परत त्यांच्या जन्मस्थळाला भेट देत नाहीत. पण तरीसुद्धा ही नाजुकशी फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात एकदाच स्थलांतर करतात आणि हे अंतर अगदी २ कि.मी. पासुन ३००० कि.मी. पर्यंत लांब असू शकते. तापमानातील आणि आर्द्रतेतील बदल, अन्नझाडांची कमतरता आणि अचानक वाढणारी संख्या ही फुलपाखरांच्या स्थलांतराची मुख्य कारणे असू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे.
पक्ष्यांमधे अथवा प्राण्यांमधे स्थलांतराचा अभ्यास करणे तसे सोपे असते कारण एकतर ते आकाराने मोठे असतात, त्यांचे आयुष्य जास्त असते आणि दरवर्षी नित्यतियमाने ते त्याच त्याच जागी परत येतात. पण फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते. त्यांची पुढची पीढी परत उत्तरेकडे उडत येते. या स्थलांतराच्या उड्डाणाकरता ही फुलपाखरे सहसा एकाचे दिशेने दोन भौगोलीक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सुर्यप्रकाश चांगला असे त्या दिवशी होतात. या सुर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती उर्जा मिळते. या स्थलांतराकरता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उदायचे हे कसे ठरवतात आणि जाण्याच्यी ठिकाणी त्यांच्या अळ्यांना भरपुर अन्नझाडे उपलब्ध आहेत की नाही हे त्यांना कसे कळते याचे कोडे काही अजुन पर्यंत उलगडलेले नाही.
आपल्या भारतातसुद्धा दोन प्रकारचे फुलपाखरांचे स्थलांतर बघायला मिळते. पहिल्या प्रकारात एकाच जातीची हजारो फुलपाखरे एकाच दिशेने उडताना दिसतात. यामधे मिल्कवीड आणि व्हाईट्स जातीची फुलापाखरे जास्त असतात. हा उडण्याचा काळ किंवा हंगाम अनिश्चीत असतो. दुसऱ्या प्रकारात हवामानात प्रतिकुल बदल झाल्यामुळे फुलपाखरे दुसरीकडे जातात. या प्रकारात सहसा त्यांची संख्या कमी असते आणि ही डोंगराळ प्रदेशातून खालच्या बाजूस उडतात. अतिथंड हवामान किंवा प्रचंड पाउस हेच याचे मुख्य कारण असते. आज भारतात जवळपास ६० जातीची फुलपाखरे स्थलांतर करतात अशी नोंद आहे. यात प्रामुख्याने कॉमन क्रो, स्ट्राईप्ड टायगर, ब्लु टायगर, डार्क ब्लु टायगर, पी ब्लु, कॉमन अल्बाट्रॉस या जाती आहेत. आज परदेशात फुलपाखरांच्या स्थलांतराच्या वेळी फुलपाखरांचे तज्ञ अक्षरश: ग्लायडर विमान घेउन त्यांचा मागोवा घेतात. पण सध्यातरी आपल्याकडे अश्या सोयीही नाहीत आणि असे लोकही नाहीत. तरीसुद्धा अगदी अलीकडे दक्षिण भारतात यावर जोरात काम सुरू झाले आहे आणि लवकरच त्या अभ्यासाचा, नोंदींचा आपल्या सर्वांना फायदा होइल.
आज भारतात या फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यास न झाल्यामुळे त्यांची काही ठोस दिशा, वेळ आणि काळ आपल्याला माहित नाही. त्यामुळे या स्थलांतरचे छायाचित्रण म्हणजे मोठे कठिणच काम आहे. पण जर का तुम्ही हिवाळ्यात जंगलात फिरायला गेलात आणि तुम्हाला यदाकदाचीत ही स्थलांतर करणारी फुलपाखरे दिसली तर मात्र त्यांचे छायाचित्रण करायचा मजा येते. याचे कारण एरवी आपल्याला एखाद दुसरे फुलपाखरू दिसते पण यावेळी मात्र हजारो फुलपाखरे एकाच वेळेस त्या जागी आपल्याकरता उपलब्ध असतात आणि या हजारो उडणाऱ्या, बसलेल्या फुलपाखरांपैकी कोणाचे छायाचित्र काढू ? असाच प्रश्न कायम पडतो. एकाच झाडावर बसलेली अगदी शेकडो फुलपाखरे मी आंबोली, वेळास, फणसाड, येऊर येथे बघीतली आहेत. त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर त्यातली बरीचशी उडतात पण तरीसुद्धा तुमच्या "फ्रेम"मधे १०/१२ फुलपाखरे तरी हमखास येणारच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments: